मुंबई : बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आज शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आणि उबाठा गटाचे नेते, पदाधिकारी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर उपस्थित होते. या भेटीनंतर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी माध्यमांशी संवाद साधत भेटीमागचे कारण सांगितले. तसेच उद्धव ठाकरेंबरोबर सर्वात मोठा विश्वासघात झाल्याचे सांगून दुःख व्यक्त केले. उद्धव ठाकरे लवकरच पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होवोत, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होवोत
“आम्ही हिंदू धर्म, सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. आपल्या धर्मात पूण्य-पापाची कल्पना मांडली आहे. पापामध्ये घात ही संकल्पना आहे. तर विश्वासघात हा सर्वात मोठा घात असल्याचे बोलले गेले आहे. उद्धव ठाकरेंबरोबर सर्वात मोठा विश्वासघात झालेला आहे. याचे दुःख अनेक लोकांच्या मनात आहे. उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर आज मी मातोश्रीवर आलो. आम्हीही त्यांच्याबरोबर झालेल्या विश्वासघातासाठी सहवेदना व्यक्त केल्या. जोपर्यंत तुम्ही पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसत नाही. तोपर्यंत आमच्या मनातील दुःख दूर होणार नाही”, अशी भावना यावेळी मी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.