मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु असल्याने महाविकास आघाडीत काहीसा तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मविआतील ज्येष्ठ नेत्यांनी चर्चेचा सूत्रं हाती घेत मविआचे गाडे पुन्हा रुळावर आणले आहे. काँग्रेसचे नाना पटोले आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे मविआत तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आता काँग्रेसने अनुभवी नेतृत्व असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे चर्चेच सूत्रं सोपवली होती. बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी सकाळी मुंबईत येत प्रथम शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले.
बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. या फॉर्म्युलानुसार, काँग्रेस पक्ष 110 जागांवर लढणार होता. यापैकी 5 जागा चर्चेअंती कमी जास्त होण्याची शक्यता आहे. तर ठाकरे पक्ष 90 जागांवर लढणार होता. यामध्येही काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पाच जागा कमी होऊ शकतात. तर शरद पवार गट 75 जागांवर लढणार होता. मात्र, आता तडजोड करण्यासाठी हा जागांचा आकडा वरखाली होण्याची शक्यता आहे.
महायुतीचं जागावाटप 25 जागांमुळे अडलं
महायुतीचे जागावाटप 25 जागांमुळे रखडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावणकुळे आणि प्रफुल पटेल यांच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. भाजपने पहिली जागा जाहीर केल्यानंतर सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 60 नावांची यादी बैठकीत मांडल्याची सूत्रांची माहिती आहे. यावेळी विद्यमान आमदारांना तिकिट देण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. उर्वरित २५ जागांचा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडण्यात आल्याचे कळते. त्यावर स्थानिक पक्षीय बलाबल, जातीय राजकारण या जागांवर तीन पक्षातील प्रमुख नेते बसून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.