मुंबई : अवकाळी पावसाचा फटका सर्वच पिकांना बसलेला आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट झालीच आहे पण धान पिकाला आता दरही योग्य मिळत नाही. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची मागणी ही विदर्भातील आमदारांनी केली होती. त्याचेच पडसाद हिवाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले. एक घाव दोन तुकडे असा स्वभाव असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आर्थिक मदत देण्याची घोषणा तर केलीच पण थेट शेतकऱ्यांना याचा लाभ कसा मिळेल याचीही काळजी त्यांनी घेतली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी डायरेक्ट खात्यात हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
मध्यस्तीची भूमिकाच नाही
धान उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीमुळे बोनस दिला जावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होती. शिवाय हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा समोर आला होता. धान उत्पादक शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळावा अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. यामुळे नियमितताही साधता येते आणि वेळेत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावेत म्हणून डीबीटी च्या माध्यमाचा उपयोग केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मध्यस्ती असणारे व्यापारी बाजूला राहून थेट मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.