चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच टीम इंडिया मायभूमीत क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. अनेक महिन्यांनंतर भारतात सामना होत असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्येही उत्साहाच वातवरण आहे. या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. चाहत्यांना इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला स्टेडिमयमध्ये उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद लुटता येणार आहे. सरकारने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
काही दिवसांपूर्वी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने पहिल्या 2 सामन्यांसाठी प्रेक्षकांसह क्रिकेट क्लबच्या सदस्यांनाही स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार नसल्याचं म्हटलं होतं. दरम्यान आता केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, दुसऱ्या सामन्यासाठी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमची क्षमता ही एकूण 50 हजार इतकी आहे. त्यानुसार 50 टक्के प्रेक्षक म्हणजेच 25 हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामन्याचा आनंद घेता येणार आहे.