मुंबई : राज्य सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटे व्यावसायिक, गरीब यांच्यासाठी पॅकेज जाहीर केलं आहे. पण यासह आणखी काही घटकांचा या पॅकेजमध्ये समावेश करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पटोले यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईचे डबेवाले आणि इतर काही छोटे व्यावसायिक यांनाही मदतीची गरज असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.
पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य सरकारनं कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी घोषित केली आहे. त्याचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत आहे. लोकांचे जीव वाचवणं ही आपली प्राथमिकता असून त्यासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे सरकारबरोबर उभा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार संचारबंदी कालावधीसाठी छोट्या व्यावसायिकांकरिता पॅकेज जाहीर केले आहे, पण या पॅकेजमध्ये आणखी काही घटकांचा समावेश करणे गरजेचे असून त्यासाठी काँग्रेसची आग्रही भूमिका असल्याचं पटोले म्हणाले. त्यात शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईचे डबेवाले यांचा त्यांना आवर्जून उल्लेख केला आहे.