पुणे : राज्यात बर्ड फ्लूची साथ नसताना आणि केवळ सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असताना या साथीची धास्ती निर्माण झाली असून कुक्कटपालन व्यवसायापुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे. आठवडय़ापूर्वी केरळमध्ये बर्ड फ्लूची साथ आढळल्याने घबराट निर्माण झाली. हरियाणात बर्ड फ्लूमुळे कोंबडय़ांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य शासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चिकन, अंडी विक्री व्यवसाय सावरत असतानाच आता केरळमधील बर्ड फ्लूच्या धास्तीमुळे चिकन, अंडय़ांच्या दरात गेल्या आठवडय़ापासून घट सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील कुक्कुटपालन व्यावसयिकांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण आहे. चिकन, अंडय़ांचे सेवन केल्याने करोनाचा संसर्ग होतो, अशी अफवा गेल्या वर्षी मार्च महिन्यात समाजमाध्यमातून पसरविण्यात आल्यानंतर चिकन, अंडय़ांच्या मागणीत कमालीची घट झाली होती. एवढेच नव्हे तर किरकोळ बाजारात १८० ते २०० रुपये किलो असणाऱ्या चिकनचा दर ५० रुपये किलोपर्यंत खाली आला होता. त्यानंतर कुक्कुटपालन व्यावसायिक शेतकऱ्यांपुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे.