नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेला आज संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोना संकटावरून विरोधकांवर टीका केली. कोरोना संकट आलं तेव्हा जग भारतासाठी चिंतेत होतं. भारत स्वत:ला या संकटातून सावरेल की नाही, असं जगाला वाटत होतं. भारताने आल्या नागरिकांच्या रक्षणासाठी अज्ञात शत्रूशी लढा दिला. भारताने ही लढाई जिंकली म्हणून आज जगाला भारताचा अभिमान वाटत आहे. भारताने ही लढाई कोणत्याही सरकार किंवा व्यक्तीच्या विरोधातील लढाई जिंकली नाही. मात्र, तरीही याचं क्रेडीट भारताला जातं, असं मोदी म्हणाले. कोरोना काळात वृद्ध महिलेने झोपडीच्या बाहेर दिवा लावला. तिची खिल्ली उडवली गेली. देशाचं मनोबल खच्चीकरण होईल, अशा गोष्टीत विरोधकांनी गुरफटून जाऊ नये, दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमधील खोटं आंदोलन करणाऱ्यांना ओळखावं लागेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिलं. राष्ट्रपतींचं भाषण आत्मविश्वास निर्माण करणार होतं. देशाला नव्या दशकातील वाटचालीचा मार्ग दाखवणारं होतं, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले. आभार मानतांना पंतप्रधान मोदी यांनी अभिभाषणावर बहिष्कार टाकल्यावरून विरोधकांना चिमटा काढला. राष्ट्रपतींचं भाषण इतकं प्रभावशाली होतं की, न ऐकताही सदस्य बरंच बोलले. त्यामुळे या भाषणाचं मूल्य खूप आहे,” असं म्हणत मोदींनी विरोधकांना टोला लगावला.“आज संपूर्ण जग संकटांचा मुकाबला करत आहे. कुणीही विचार केला नसेल की, मानव जातीला अशा कठीण काळातून जावं लागेल. असंख्य संकटांच्या फेऱ्यात राष्ट्रपतींचं भाषण झालं. हे त्यांचं दशकाचं पहिलं भाषण आहे. जेव्हा संपूर्ण जगाकडे बघतो तेव्हा, भारतातील युवा शक्तीकडे जाणवतं की भारत खऱ्या अर्थाने संधींची भूमी आहे. असंख्य संधी आपली वाट बघत आहे. जो देश तरुण आहे. उत्साहाने भरलेला आहे. जो देश अनेक संकल्प करून ते पूर्ण करण्याच्या दिशेने जात आहे. तो देश या संधी कधीही जाऊ देणार नाही,” असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.