मुंबई : कुणाच्याही कौटुंबिक प्रश्नांचं राजकारण करु नये, शरद पवार यासंदर्भात योग्य निर्णय घेतील. तसेच महाविकास आघाडी सरकारला या घटनेमुळे कोणताही धोका नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्याचसोबत शेतकरी कायदे मागे घेतले तर सरकारची प्रतिमा ही अधिक उजळेल, सरकारनं समन्वय दाखवावा आणि एक पाऊल शेतकऱ्यांसाठी मागे यावं, असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी बोलताना सांगितलं की, “धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेले आरोप हा पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील. शेवटी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्त्वही आहेत. सुजाण, प्रगल्भ आहेत. काय निर्णय घ्यावेत? काय नाही, याचा अनुभव सर्वाधिक कोणाला असेल तर तो राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना आहे. याप्रकरणामुळे महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल असं वाटत असेल, तर तो भ्रम आहे.”