येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यात 3 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केलीय. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा झाला नाही तर तीन दिवसांत लसरीकरण बंद पडण्याची भीती टोपे यांनी व्यक्त केलीय. लसीच्या तुटवड्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी राज्यातील मंत्री, मुख्यमंत्री यांनी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्र सरकारशी संवाद साधावा, असा खोचक सल्ला दिलाय.
लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्राशी संवाद करा
राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते लसीकरणा संदर्भात करत असलेला आरोप चुकीचा आहे. राज्यातील लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक पुरवठा करण्यात येत असल्याचा दावाही फडणवीसांनी केलाय. केंद्र सरकारकडून देशभरात सर्वात जास्त लसी या महाराष्ट्राला दिल्या आहेत. भारत सरकार काही वेगळं आहे का? या गोष्टी माध्यमांशी बोलण्याऐवजी केंद्राशी चर्चा करणं गरजेचं आहे. अशी चर्चा केली जात नाही. माध्यमांमध्ये बोलायचं आणि हात झटकायचं हे बंद झालं पाहिजे. विरोधकांना म्हणायचं राजकारण करु नका आणि सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्र्यांनीच राजकारण करायचं हे योग्य नाही, असंही फडणवीसांनी म्हटलंय.