सोलापूर विद्यापीठात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती’निमित्त विशेष व्याख्यान व पुस्तक प्रकाशन
सोलापूर, दि. १३ – “लोकशाही हाच आपला जीवन जगण्याचा मार्ग असावा,” असे प्रतिपादन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, तुळजापूर येथील संचालक डॉ. बाळ राक्षसे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहा’ अंतर्गत सोमवारी विशेष व्याख्यान व पुस्तक प्रकाशन समारंभ पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बाळ राक्षसे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, समन्वयक डॉ. गौतम कांबळे, परीक्षा विभाग संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे, डॉ. प्रभाकर कोळेकर तसेच विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. केदारनाथ काळवणे उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. बाळ राक्षसे यांनी भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये स्पष्ट करताना समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा सखोल विचार मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या लोकशाही राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टिकोनावर त्यांनी विशेष भर दिला. “लोकशाही ही केवळ शासनपद्धती नसून ती जीवनपद्धती आहे,” असेही त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमात कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. तर राजाभाऊ सरवदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सोलापूरशी असलेले ऐतिहासिक व सामाजिक ऋणानुबंध विषद केले. यावेळी निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये कुणाल बाबरे, आम्रपाली आठवले, अनिता भोसले आणि ज्ञानेश्वरी हजारे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र वडजे यांनी मानले.
