येस न्युज मराठी नेटवर्क । अरबी समुद्रात निर्माण झालेलं तौते चक्रीवादळ सोमवारी मुंबईपासून गुजरातच्या दिशेनं गेलं. रौद्रवतार धारण केलेल्या या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, मुंबईसह इतर शहरांना फटका बसला. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने ‘बॉम्बे हायजवळच्या परिसरात ओएनजीसी’चं पी ३०५ (पापा-३०५) मोठं जहाज बुडाल्याची घटना घडली. रविवारी सायंकाळी जहाजावरून एसओपी संदेश मिळाल्यानंतर नौदलाने मदत व बचावकार्य हाती घेतलं होतं. जहाजावर २६० लोक होते, त्यापैकी १४७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं असून, इतरांचा शोध घेतला जात आहे. नौदल आणि ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.
मुंबईजवळच्या अरबी समुद्रात ‘बॉम्बे हाय’ असून, तेथे तेल उत्खनन होते. याच परिसरात हिरा ऑईल क्षेत्र असून, याठिकाणी ‘ओएनजीसी’चं जहाज पी ३०५ उभं होतं. दरम्यान, कोकण किनारपट्टी ओलांडून तौते चक्रीवादळ मुंबईच्या दिशेनं सरकले. त्यानंतर जहाज अपघातग्रस्त झालं. चक्रीवादळाबरोबरच प्रचंड मोठ्या लाटा येत असल्याने जहाजाचा नांगर दूर गेला आणि जहाज भरकटायला लागलं. त्यानंतर जहाजावरून नौदलाला एसओपी (जहाज संकटात वा बुडत असल्यास जो संदेश पाठवला जातो, त्याला संक्षिप्त स्वरूपात एसओपी म्हटलं जातं) संदेश पाठवण्यात आला. या जहाजांच्या मदतीला INS कोच्ची, INS कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आलं होतं, असं ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.