येस न्युज मराठी नेटवर्क । राज्यात एकीकडे काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे शिवसेनेमधूनच भाजपासोबत पुन्हा युती करण्यासाठी मागणी केली जात आहे. त्यासंदर्भातलं एक पत्रच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे आधीच महाविकासआघाडीच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केलं जात असताना प्रताप सरनाईक यांच्या या ‘लेटरबॉम्ब’मुळे ते प्रश्नचिन्ह अधितच मोठं झाल्याचं दिसू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून या पत्रावर काय खुलासा येतो, याकडे राजकीय विश्वाचं लक्ष लागलं आहे.
या पत्रामध्ये प्रताप सरनाईक यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “या परिस्थितीमधे जे राजकारण सुरू आहे, त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करत असतील, तर या स्थितीत मला पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल”, अशी थेट मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे.