पणजी : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी जाहीर उपस्थिती लावलेली नाही. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही ते गैरहजर होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मुख्यंत्रीपदी विराजमान होतील की काय, अशा चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याविषयी प्रतिक्रिया नोंदवली.
रश्मी ठाकरे मुख्यमंत्री पदी? काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनीदेखील काल जाहीरपणे वक्तव्य केले. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान होऊ शकतील, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. याविषयी संजय राऊत यांनी थेट वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘ उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. मी सध्या गोव्यात आहे. पण मला त्यांची माहिती आहे. कालही त्यांनी शिवसेनेचे विभागप्रमुख, शाखाप्रमुखांशी संवाद साधला. सध्या प्रत्यक्ष संवादापेक्षा सगळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच संवाद साधत आहेत. सगळ्यांना दिसतायत ते संवाद साधताना. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील तसाच संवाद साधत आहेत. शेवटी व्यक्ती समोर दिसते, सूचना देते, फायलींवर सह्या होतायत. प्रशासनाला सूचना दिल्या जातायत. राज्यावर लक्ष ठेवलं जातंय,हे सगळं सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचा राज्यकारभार सुरु आहे. तेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. यात मला कोणतीही शंका वाटत नाही.’