नवी दिल्ली : मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर्ष करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरीही दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याबाबतच्या कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुलगी 21 वर्षाची झाल्याशिवाय कोणत्याही पालकांना तिचं लग्न लावून देता येणार नाही.
15 ऑगस्ट 2020 रोजी लालकिल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याचा उल्लेख केला होता. मुलींचा कुपोषणापासून बचाव करण्यासाठी त्यांचा विवाह योग्यवेळी होण्याची आवश्यकता असल्याचं मोदी म्हणाले होते.
सध्या वयाची अट काय?
विद्यमान कायद्यानुसार मुलीच्या लग्नाची वय 18 वर्ष ठरवण्यात आलं आहे. आता हे वय 18 वरून 21 वर्ष करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसा प्रस्तावही कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर केला आहे. आता बालविवाह प्रतिबंधक कायदा, स्पेशल मॅरेज अॅक्ट कायदा आणि हिंदू मॅरेज अॅक्ट कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे.