सिंधुदुर्ग : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोकणात येऊन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच ललकारले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना शिवसेनेने तिलांजली दिली आहे. बाळसााहेबांचे विचार तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेच्या लालसेपोटी सत्तेत आली आहे, अशी घणाघाती टीका अमित शहा यांनी केली. त्यामुळे भाजपने आता राज्यातील महाविकास आघाडी विरोधात अधिक आक्रमक होण्याचा पवित्रा घेतल्याचं बोललं जात आहे.
अमित शहा यांच्या हस्ते भाजप नेते नारायण राणे यांच्या रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अमित शहा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांना ललकारले. तसेच आम्ही मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेला कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचंही शहा यांनी तब्बल दीड वर्षानंतर जाहीरपणे स्पष्ट केलं. या शिवाय राज्यातील ठाकरे सरकार हे लालची सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली. शिवसेनेने बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत आली आहे, अशी टीका अमित शहा यांनी केली.