मुंबई : सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर रस्त्याला मंजुरी देण्यात आली असून यामुळे मुंबई-पुण्यातील वाहतूक कोंडी ५० टक्क्यांनी कमी होईल अशी माहिती दिली. तसेच समृद्धी महामार्गाच्या बाजूने मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर २५ ते ३० लाखांची नवी पाच शहरे विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे नितीन गडकरींनी सांगितले . मुंबई, पुण्याच्या विकासाऐवजी इतर जे टू-टायर सिटी आहेत, त्याचा विकास करण गरजेचे आहे, असे मत केंद्रीय रस्ते मंत्री गडकरी यांनी व्यक्त केले आहे. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवेमुळे वाहतूक कोंडी कमी होईल. येत्या सहा महिन्यात फ्लेक्सी इंजिन आणणार, पूर्णपणे इथेनॉलवर चालणारे इंजिन अशी माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे, असे मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे असे स्पष्ट मत केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या विकासासंबंधी व्हिजन मांडले .गेल्या ७५ वर्षात महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान झाला नाही असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “महाराष्ट्राचा प्रधानमंत्री झाला पाहिजे, असे मला अजिबात एक टक्काही वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती प्रधानमंत्री झाला पाहिजे. मग त्याची जात, धर्म, पंत आणि राज्य कोणतंही असो. त्यामुळे मराठी माणूसच झाला पाहिजे किंवा महाराष्ट्रातलाच झाला पाहिजे, असं काही मला मान्य नाही. उद्या जर एखादा मराठी माणूस त्या पात्रतेचा असेल तर तो प्रधानमंत्री होईल. त्याला ती संधी मिळेल”.“महाराष्ट्र प्रगतीशील आणि समृद्ध राज्य आहे. त्यामुळे आपली ताकद आणि त्रुटी समजून घेण्याची गरज आहे. पायाभूत सुविधांचा विचार करक मुंबईचा विकास केला पाहिजे. मुंबईला तिन्ही बाजूने समुद्र असून विकास होण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. नवी मुंबईतही गर्दी झाली आहे. त्यामुळे मुंबईतील उद्योग-व्यावसायाचं महाराष्ट्रात विकेंद्रीकरण झालं तर राज्याचा विकास होईल. महाराष्ट्र सरकारने सल्लामसलत करुन पुढील २५ वर्षांचं व्हिजन डॉक्यूमेंट तयार केलं पाहिजे. अमलबजावणी केल तर महाराष्ट्र अजून पुढे जाईल आणि गरिबी, भूकबळी यातून मुक्त होईल,” असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.