मुंबई : कोरोना संकटाच्या काळात आपल्या जिवाची बाजी लावून गावागावात जनजागृतीचं काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी आता एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका एक लाख सरकारी मोबाईल शासनाला परत करणार आहेत. पोषण आहार कार्यक्रमा अंतर्गत 2019 मध्ये अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले होते. या मोबाईल्सचा कालावधी 2021 मध्ये संपला आहे. अशावेळी 2 जीबी रॅमचा मोबाईल दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांकडून वसूल केला जातोय.
अंगणवाडी सेविकांना हे मोबाईल 2019 मध्ये पोषण आहार कार्यक्रमा अंतर्गत देण्यात आले होते. मोबाईलमध्ये लाभार्थी यादी, वजन, हजेरी, उंची, स्तनदा माता, गर्भवती महिलाांची माहिती, पोषण आहाराचे वाटप, इत्यादी माहिती नोंद केली जात होती. मात्र, आता या मोबाईलचा कालावधी संपला आहे. अशावेळी मोबाईल दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांकडून वसूल केला जात आहे. तर 3 हजार पेक्षा जास्त मोबाईलवर इंटरनेटही व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने हा निर्णय घेतला आहे.