येस न्युज मराठी नेटवर्क : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे. आमच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना किती नैतिकता पाळली होती? असा सवाल करतानाच विरोधकांनी आधी स्वत:ला आरक्षात पाहावे, असा घणाघाती हल्ला अमोल कोल्हे यांनी केला आहे.
सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरून विरोधकांचे वाभाडे काढले. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागमी करणारे विरोधक जेवढ्या नैतिकतेची अपेक्षा आमच्याकडून करतात तेवढी नैतिकता विरोधकांनी सत्तेत असाताना पाळली होती का? विरोधकांनी आधी स्वत:ला आरक्षात पाहावे, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली.
हे आम्हाला शिवभक्ती शिकवणार?
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याच्या भाजपच्या मागणीचाही त्यांनी समाचार घेतला. औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा मुद्दा कोण उचलतोय हे पाहून मला अप्रुप वाटतंय. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजवले… ज्यांनी महाराजांच्या गडकोटावर डेस्टिनेशन वेडिंग व्हावे म्हणून जीआर काढला… हे लोक आम्हाला शिवभक्ती शिकवणार आहेत का? असा खणखणीत सवालही त्यांनी केला.
विरोधकांकडे आरसे शिल्लक नसावेत
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आणि औरंगाबादचे नामांतर करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. आज जे विरोधात आहेत. त्यांच्याकडे कदाचित आरसे शिल्लक नसावेत. त्यांनी जर आरशात पाहिले तर त्यांच्या मागण्या रास्त आहेत हे त्यांना कधीच वाटणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.