सोलापुर – कोरोना -१९ अंतर्गत लॉकडाऊनचे काळात सोलापूर महानगरपालिके मार्फत व पोलिसांमार्फत अनेक व्यापाऱ्यांचे छोटे – मोठे गाळे सिल करण्यात आलेले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे . एकतर गाळे बंद ठेवणेचे आदेश असल्याने , व्यापार बंद आणि व्यापार बंद असल्याने आर्थिक उलाढाल बंद त्यामुळे अनेक छोटे – मोठे व्यापारी आर्थिक संकटात आले असून अनेक लोकांवर उपासमारीची वेळदेखील आलेली आहे .
अशा परिस्थिती असताना त्या व्यापाऱ्यांना दंड भरल्यानंतरच दुकाने सुरु करावी लागणार आहे तेंव्हा पोलिस खात्याकडून आणि महापालिकेकडून जवळ जवळ रु .५००० / – ते १०००० / – पर्यंत दंड आकारण्यात आलेले आहे. दुकाने बंद असल्याने व व्यापार ठप्प असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झालेने, ज्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्यांच्या वरील करण्यात आलेली दंडात्मक कारवाई माफ करावी , आणि ज्या ज्या व्यापाऱ्यांची दुकाने सील करण्यात आलेली आहेत त्या त्या व्यापाऱ्यांना दुकाने उघडून व्यापार सुरु करण्याची मुभा देण्यात यावी .
सध्या सोलापूर शहरामध्ये कोरोना -१९ अंतर्गत लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे . लोकांना उत्पन्नाचे साधन नसल्याने कित्येक कुटुंबांना उपासमारीचा सामना करावा लागला आहे . अशा परिस्थितीत लोकांवर दंडात्मक कारवाई म्हणजे हिटलरशाही होणार आहे . सबब सदर छोट्या – मोठ्या व्यापाऱ्यांना त्यांना करणेत आलेल्या दंडात्मक कारवाई माफ करावी अन्यथा सोलापूर शहरातील नागरीक , व्यापारी व भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल याची गंभीर नोंद घ्यावी . सदरचे पत्र मिळताच दंडात्मक कारवाईमध्ये सूट देण्याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.