येस न्युज मराठी नेटवर्क : भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. कांस्य पदकासाठी जर्मनीशी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 असा विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने हॉकीमधला 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला आहे. तब्बल 41 वर्षानंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळात पदक जिंकलं आहे.
सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करत जर्मनीने भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. पण भारत आत्मविश्वासने खेळत होता. पहिल्या क्वार्टरनंतर जर्मनीला 1-0 ने आघाडी मिळाली. म्हणजेच पहिल्या क्वार्टरवर जर्मनीचं वर्चस्व राहिलं. दुसऱ्या क्वार्टरमध्ये सुरुवातीलाच भारताच्या सिमरनजीतने एक गोल करत जर्मनीशी बरोबरी केली. पण नंतर पुन्हा जर्मनीने दोन करत भारताला बॅकफूटला ढकललं. पण जर्मनीच्या दोन गोलनंतरही भारतीय संघ तसूभरही मागे हटला नाही.
भारताने जिद्द न सोडता आपला खेळ दिमाखात सुरु ठेवला. प्रत्येक भारतीय खेळाडूच्या मनात आज आत्मविश्वास ठासून भरला होता. मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घ्यायचा हे भारतीय संघाने ठरवलं होतं. त्यानुसार हार्दिक सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत जर्मनीची आघाडी कमी केली. तसंच हरमनप्रीतने पुन्हा गोल करत जर्मनीशी बरोबरी केली. म्हणजेच तिसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण 5 गोल झाले
काहीही करुन आजचा सामना जिंकायचाच, असा निश्चय भारतीय संघाने केला होता. त्यानुसार तिसऱ्या क्वार्टरची सुरुवात भारतीय संघाने जबरदस्त केली. सामन्याच्या 29 व्या मिनिटाला रुपिंदर सिंगने गोल केला. तिथंच भारताला आघाडी मिळाली. लगेचच 5 मिनिटांनी सिमरनजीतने गोल करुन भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जर्मनीने पेनल्टी कॉर्नर मिळवले पण त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यास जर्मनीला अपयश आलं. सरतेशेवटी कांस्य पदकाच्या सामन्यात भारताने जर्मनीला 5-4 ने पराभूत करुन 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला.