येस न्युज मराठी नेटवर्क : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेने वादंग निर्माण झाले. राहुल गांधी यांच्या या भूमिकेविरोधात भाजपने राज्यभर आंदोलन केलं. तसंच प्रसारमाध्यमांतूनही राहुल यांच्यावर टीकेची झोड उठवली. मात्र राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या आरोपांवर निशाणा साधताना राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
‘राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं. मग त्याचा अर्थ काय होतो? ब्रिटीश संविधानाची शपथ तर नाही घेतली ना,’ असं वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेच्या कार्यक्रमात बोलताना केलं आहे. त्रिवेदी यांच्या या वक्तव्यानंतर संताप व्यक्त केला जात असून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी याबाबत जोरदार आक्षेप नोंदवला आहे.