वर्ष २०२५ मध्य रेल्वेकरीता प्रवासी-केंद्रित वाढ, संरक्षा सुधारणा, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि हरित उपक्रमांचे वर्ष
मध्य रेल्वेने २०२५ मध्ये विद्युतिकरणाच्या १०० वर्षांचा गौरवपूर्ण उत्सव साजरा केला. १९२५ मध्ये हार्बर मार्गावर व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला दरम्यान धावलेल्या पहिल्या विद्युत रेल्वेच्या ऐतिहासिक प्रवासाचे स्मरण यानिमित्ताने करण्यात आले. हा महत्त्वपूर्ण टप्पा प्रगती, नवोन्मेष आणि राष्ट्रसेवेच्या शतकभराच्या प्रवासाचे प्रतीक आहे.
प्रवासी सेवा, सुरक्षिततेत वाढ, पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटायझेशन, हरित ऊर्जेचा अवलंब, स्थानकांचे पुनर्विकास तसेच नाविन्यपूर्ण तांत्रिक उपाययोजना अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय यशांमुळे २०२५ हे वर्ष मध्य रेल्वेसाठी महत्त्वपूर्ण वर्ष ठरले. या सर्व उपक्रमांद्वारे प्रवाशांचा प्रवासानुभव अधिक सुखकर करण्याची आणि कार्यक्षमतेत उत्कृष्टता साध्य करण्याची मध्य रेल्वेची दृढ बांधिलकी अधोरेखित झाली आहे.
प्रवासी सेवा आणि कामगिरी
२०२५ मध्ये मध्य रेल्वेने प्रवासी तसेच मालवाहतूक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. संपूर्ण नेटवर्कवरून १,५०० दशलक्षाहून अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यात आली असून, प्रवासी, कोचिंग व इतर उत्पन्नासह एकूण रु१६,११० कोटींपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला. मालवाहतूक क्षेत्रातील कामगिरीही भक्कम राहिली असून, वर्षभरात ७३.३७ दशलक्ष टन मालाची वाहतूक नोंदवण्यात आली.
प्रवासी सुविधा आणि सोयी
प्रवाशांच्या सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. २०२५ दरम्यान विविध स्थानकांवर २१ एस्कलेटर आणि २३ लिफ्ट कार्यान्वित करण्यात आल्या. उपनगरीय संपर्क अधिक सक्षम करण्यासाठी नेरुळ/बेलापूर ते उरण दरम्यान १० अतिरिक्त उपनगरीय सेवा सुरू करण्यात आल्या.
तसेच मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोबाइल यूटीएस सहाय्यकांची सुविधा सुरू केली असून, हातातील उपकरणे व पोर्टेबल प्रिंटरच्या माध्यमातून तात्काळ तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे रोख तसेच डिजिटल दोन्ही प्रकारच्या पेमेंटची सोय उपलब्ध झाली असून, तिकीट रांगांमध्ये लक्षणीय घट होऊन प्रवास अधिक सुलभ झाला आहे.तिकीट तपासणी मोहिमांदरम्यान अनधिकृत अथवा विनातिकीट प्रवासाच्या ३७.५५ लाख प्रकरणांचा शोध घेतला असून, यामध्ये रु२१६.६२ कोटींचा दंड वसूल करण्यात आला. यामुळे भाडे शिस्तीचे पालन अधिक बळकट झाले असून प्रवाशांमध्ये शिस्तबद्ध प्रवासाला प्रोत्साहन मिळाले आहे.
उपनगरीय स्थानके आणि नवीन सेवा
नेरुळ/बेलापूर– उरण मार्गावर तरघर आणि गव्हाण ही दोन नवीन उपनगरीय स्थानके कार्यान्वित करण्यात आली असून, या मार्गावर १० अतिरिक्त उपनगरीय सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाढत्या निवासी व औद्योगिक परिसरांना अधिक सुलभ प्रवेश मिळाला आहे. यासोबतच नवनिर्मित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संपर्कही अधिक मजबूत झाला आहे.
अनेक नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या, त्यामध्ये पुढील सेवांचा समावेश आहे :
- पुणे– अजनी वंदे भारत एक्सप्रेस
- नांदेड– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस– सहरसा अमृत भारत एक्सप्रेस
- जोधपूर– पुणे एक्सप्रेस
- हडपसर– रीवा एक्सप्रेस
- अहिल्यानगर– बीड डेमू
विशेष रेल्वे सेवा
हंगामी व सणासुदीच्या प्रवासी मागणीची पूर्तता करण्यासाठी मध्य रेल्वेने वर्षभरात ३,०९७ हून अधिक विशेष रेल्वे सेवा चालविल्या. यामध्ये कुंभमेळा, दिवाळी, छठ पूजा, उन्हाळी सुट्ट्या, गणपती उत्सव, होळी, आषाढी वारी तसेच महापरिनिर्वाण दिनासाठीच्या सेवांचा समावेश होता.
महाकुंभ २०२५ दरम्यान, मुंबईहून सहा विशेष गाड्यांसह एकूण ८२३ रेल्वे सेवा चालवून लाखो भाविकांसाठी सुलभ व आरामदायी प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी विविध गाड्यांना ५२ नवीन थांबेही देण्यात आले.
पायाभूत सुविधांचा विकास
२०२५ मध्ये पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठण्यात आले. मध्य रेल्वेने आव्हानात्मक ९.४५ किमी लांबीचा शिंदवणे– अंबाळे घाट विभाग कार्यान्वित करून २८१ किमी लांबीच्या पुणे– मिरज दुहेरीकरण प्रकल्पाची पूर्तता केली, ज्यामुळे या मार्गावरील वाहनक्षमता वाढली आहे.
तसेच अमळनेर– बीड रेल्वे मार्गही कार्यान्वित करण्यात आला असून, यामुळे यापूर्वी रेल्वेसेवेपासून वंचित असलेल्या भागांना ऐतिहासिक रेल्वे संपर्क मिळाला आहे. यासोबतच अहिल्यानगर आणि बीड दरम्यान अखंड व सुलभ रेल्वे संपर्कही प्रस्थापित झाला आहे.
दौंड– सोलापूर– वाडी विभागाचे उन्नतीकरण करण्यात आले असून, ३४१.८० किमी लांबीच्या मार्गावर कमाल अनुमत वेग ११० किमी प्रतितासावरून १३० किमी प्रतितास इतका वाढवण्यात आला आहे. याचा लाभ ४४ जोड्या गाड्यांना होत आहे. नूतनीकरण करण्यात आलेले कर्जत यार्ड तसेच नवीन रूट रिले इंटरलॉकिंग प्रणालीमुळे कार्यसुरक्षा आणि विश्वासार्हता अधिक बळकट झाली आहे.
तसेच नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी सुमारे रु१५०० कोटींच्या तयारीच्या कामांनाही सुरुवात करण्यात आली आहे.
संरक्षा, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष
मध्य रेल्वेने रेल्वे सुरक्षिततेच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठला, जेव्हा सर्व पाच विभागांमध्ये कवच लोको चाचण्या पूर्ण केल्या आणि सहा महिन्यांत हे यश गाठणारी पहिले क्षेत्रिय रेल्वे ठरली. या प्रणालीला मध्य रेल्वे नेटवर्कवर राबविण्याची योजना आहे, ज्यासाठी व्यापक कर्मचारी प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.
यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुकूल ईएमयू डब्याची सुरुवात, ऑप्टिकल ग्राउंड वायर कम्युनिकेशन प्रणाली, आणि पावसाळ्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी व प्रवासी डब्यांमधील पाण्याच्या पातळीचे रिअल-टाइम निरीक्षण करण्यासाठी पुरस्कार-विजेत्या स्वदेशी उपायांचा समावेश होता.
हरित उपक्रम
मध्य रेल्वेने ओपन ऍक्सेस वीज खरेदीचा अवलंब करून शाश्वततेच्या क्षेत्रात आघाडीची भूमिका बजावली आहे. यामुळे खर्च-कुशलता, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक वीज पुरवठा सुनिश्चित होतो. हा उपक्रम भारतीय रेल्वेच्या २०३० पर्यंत शुद्ध शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या उद्दिष्टाला पाठबळ देतो.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठळक वैशिष्ट्ये
या वर्षात अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले गेले, ज्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सामूहिक गायनाने साजरा केलेला ‘वंदे मातरम’चा १५० वा वर्धापनदिन; वंदे भारत आणि मालगाड्यांचे संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते संचालन करून साजरा केलेला आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२५; आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित वारसा प्रदर्शनाचा समावेश असलेला जागतिक वारसा दिन यांचा समावेश आहे.
१५ स्थानकांवर स्टेशन महोत्सवांचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे सामुदायिक सहभागाला चालना मिळाली आणि रेल्वेच्या वारशाचा उत्सव साजरा झाला.
प्रवाशांचे संरक्षण आणि कल्याण
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत आरपीएफने १,४९९ मुलांची सुटका केली, तर ‘ऑपरेशन जीवन रक्षक’ अंतर्गत रेल्वे परिसरात ६९ लोकांचे प्राण वाचवण्यात आले, जे रेल्वेच्या प्रवासी कल्याणासाठी असलेल्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे.
भविष्यातील योजना
२०२६ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा असलेले मुख्य प्रकल्पांमध्ये पनवेल– कर्जत उपनगरीय कॉरिडॉर, दौंड– मनमाड दुहेरीकरण आणि मध्य रेल्वेवर अधिक १५ डब्यांच्या गाड्यांची सुविधा यांचा समावेश आहे.
मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ, पायाभूत सुविधा सुधारणा, डिजिटल उपाययोजना स्वीकारणे, हरित ऊर्जेचा प्रचार आणि जागतिक दर्जाच्या रेल्वे सेवा पुरविणे या मिशनमध्ये दृढ बांधिलकी ठेवून कार्यरत आहे. २०२५ मधील यश हे राष्ट्रनिर्मिती आणि सार्वजनिक सेवेतील त्याच्या निःस्वार्थ समर्पणाचे प्रतीक आहे.

