कारगिल युद्धाला २६ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतीय सैन्यदल, सरहद्द संस्था, पुणे तसेच आरहम फाऊंडेशनच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘सरहद्द शौर्यथॉन-२०२५’ या स्पर्धेला झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, भारतीय सैन्यदलातील प्रमुख अधिकारी, सरहद्द संस्थेचे संजय नहार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
कारगिलच्या युद्धात भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत आपल्या मायभूमीचे रक्षण केले. भारतीय सैन्यदलांचे शौर्य, धाडस आणि बलिदान यांना सलाम करण्यासाठी या शौर्यथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे समुद्रसपाटीपासून १० हजार ८०० फूट उंचीवर ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील तीन हजार धावपटू सहभागी झाले होते.
स्पर्धकांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करणे आणि कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण करणे असे उद्देश असलेल्या या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल भारतीय सैन्यदल, आरहम फाऊंडेशन तसेच सरहद्द संस्थेचे विशेष आभार मानले. या उद्घाटन सोहळ्यानंतर कारगिल येथील ऑपरेशन विजयमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना मानवंदना दिली. तसेच कारगिल येथील युद्ध संग्रहालयाला भेट देऊन त्याचीही पाहणी केली. विशेष म्हणजे द्रास येथील सैन्यदलाच्या मुख्यालयात सरहद्द संस्थेच्या पुढाकाराने तयार करण्यात येत असलेल्या ‘लेझर शो’च्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने तीन कोटींचा निधी देण्याचे मान्य केले होते. या निधीचा धनादेश देखील याप्रसंगी द्रास येथील तळाचे कोअर लेफ्टनंट कमांडर हितेश भल्ला यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.





