सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरला दि.२० जून २०२५ रोजी सकाळी ११ वा राजभवन, मुंबई येथे एक तासाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खास निमंत्रित करण्यात आले आहे. देशातील विविध राज्यांचे स्थापना दिवस राजभवनात साजरे केले जातात. त्यासाठी राज्यातील नामांकित विद्यापीठांच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संघाला निमंत्रित केले जाते. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला विद्यापीठ स्थापनेपासून पहिल्यांदाच निमंत्रित करण्यात आले आहे.
मागील तीन वर्षात आंतरमहाविद्यालयीन ते राष्ट्रीय युवा महोत्सवात विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाची दखल राजभवन यांनी घेतली आहे. गेल्या तीन वर्षात विविध कला स्पर्धेत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान कामगिरी केली आहे. त्यामुळेच सदरचा कार्यक्रम करण्याची संधी विद्यापीठाला मिळाली आहे. दि.२० जून २०२५ रोजी सकाळी ११ वा मा.राज्यपाल, विद्यापीठाचे कुलगुरू आणि राजभवनातील अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा एक तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या दिवशी पश्चिम बंगालचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे एक तासाच्या कार्यक्रमातून पश्चिम बंगालची संस्कृती विविध कलाप्रकाराच्या माध्यमातून साजरी केली जाणार आहे. नृत्य, नाट्य, अभिनय, वादन, संगीत, वाड्मय असा कलासंगम घडवत कार्यक्रमाची रचना केली आहे. पश्चिम बंगालची लोकपरंपरा, सांस्कृतिक वैविध्य, सांस्कृतिक वेगळेपण यांना आविष्कृत करणारे एकपात्री नाट्य, लोकगीत, लोकनृत्य आणि माहितीपट यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली तयारी सुरू आहे. विद्यार्थी कलावंत, साथीदार, प्रशिक्षक, शिक्षक, कर्मचारी असा 45 लोकांचा संघ राजभवन येथे जाणार आहे. संघाचे सादरीकरण उत्तम व्हावे, यासाठी गेल्या दहा दिवसापासून कसून सराव सुरू आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ.अतुल लकडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. प्रभाकर कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू आहे.
शुक्रवार 20 जून 2025 रोजी राजभवन मध्ये महामहिम राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी विद्यापीठात खास निमंत्रण आले आहे. त्यानुसार विद्यापीठाचे विद्यार्थी कलावंत तयारी करीत आहेत. विद्यापीठाला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे. याचा निश्चितच मनस्वी आनंद झाला आहे. एक चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आम्ही राजभवनला देऊ.
डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू
राजभवन येथे आपले विद्यार्थी पहिल्यांदाच कलासादरीकरण करत आहेत, याचा मला प्रमुख म्हणून मनस्वी आनंद आहे. आपण इतर विद्यापीठाच्या तुलनेत कुठेही कमी नाही, हे गेल्या काही वर्षात युवा महोत्सवातून मुलांनी देश पातळीवर सिध्द केले आहे.२० तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाची चांगली तयारी सुरू आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मुलांना देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे हा कार्यक्रम उत्तम होईल, याची खात्री आहे.
डॉ. केदारनाथ काळवणे, संचालक, विद्यार्थी विकास