सोलापूरच्या वालचंद इन्स्टिट्यूटच्या चार दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘अव्युक्तम इनोव्हेशन प्रा. लि.’ नावाची स्टार्टअप कंपनी सुरू केली आणि ‘इंटरनॅशनल पुणे अँग्री हॅकथॉन २०२५’ मध्ये २५ लाखांचे पहिले बक्षीस जिंकले. त्यांनी ही रक्कम स्वतःसाठी खर्च न करता ते गुंतवणूक करून कंपनी स्थापन केली आणि प्रोटोटाइप तयार करण्यासाठी वापरली. हे यंत्र शेतकऱ्यांना अचूक आणि पर्यावरणपूरक कीटकनाशक फवारणीस मदत करते. या कल्पनेला देश-विदेशात मोठा प्रतिसाद मिळाला असून, हे यश युवकांसाठी प्रेरणादायक ठरले आहे.
१ ते ३ जून २०२५ दरम्यान महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटी (MSInS) यांच्या यांच्या सहकार्याने आयोजित या देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी नवोपक्रम स्पर्धेत डब्ल्यू आय. टी. च्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे, सखोल तांत्रिक ज्ञानाचे आणि प्रात्यक्षिक सादरीकरणाचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवले.
परितोषिकातील २५ लाख रुपयांपैकी १२.५ लाख रुपये मार्केट-रेडी प्रोटोटाइपसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या प्रोटोटाइप प्रयोगशाळेच्या टप्प्यावर आहे. या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या यंत्राद्वारे शेतकरी अचूक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने कीटकनाशकांची फवारणी करू शकतात. यामुळे खर्चात बचत होते आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणामही कमी होतात. या नावीन्यपूर्ण संकल्पनेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा प्रतिसाद मिळाला.
जगभरातून शंभरहून अधिक स्पर्धकांमध्ये अव्वल ठरलेले उपकरण
या हॅकेथानमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘स्मार्ट पेस्टिसाईड स्प्रेअर’ हे पर्यावरणस्नेही आणि आधुनिक कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त उपकरण ठरले. त्यांनी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या १०० हून अधिक संघांतील बहुसंख्य संघ प्रस्थापित उद्योग समूहाचे होते, त्या सगळ्यांना मागे टाकून डब्ल्यु. आय.टी. ने पहिला क्रमांक मिळवला. या विजयी विद्यार्थ्यांनी या पूर्वी ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024′, पुण्यातील ’51 नॅशनल लेव्हल इव्हेंट’ आणि ‘इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स इन्स्टिट्यूट’ (IEEE) च्या स्पर्धांमध्ये पहिले पारितोषिक मिळवले. या स्पर्धांमधून मिळालेल्या सुमारे दोन लाख रुपयांची रक्कम विजयी विद्यार्थ्यांनी उद्योग उभारणीसाठी वापरली. बक्षिसाच्या रकमेचा उपयोग प्रोटोटाइप बनवण्यासाठी केला. याला ‘बूटस्ट्रॅपिंग’ किंवा ‘एंजल इन्व्हेस्टमेंट’ असे म्हणतात. या विजयी विद्यार्थ्यांनी पुणे हॅकेथॉनमध्ये त्यांनी पुढील १० वर्षांचा व्यवसाय आराखडा परीक्षकांसमोर मांडला. यात ‘व्हेंचर कॅपिटल’, ‘सीरिज A व B फंडिंग’, ‘मेझानाईन फंडिंग’ आणि शेवटी ‘IPO’पर्यंतचा प्रवास आत्मविश्वासाने सादर केला,
दुसऱ्या वर्षातच स्टार्टअप कंपनी स्थापन करून धाडसी पाऊल
हे सर्व विद्यार्थी सध्या दुसऱ्या वर्षात असून, त्यांनी ‘कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालया’त नोंदणी करून प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली आहे. ऋग्वेदी पाटील (संघ नायिका), वरुण दोरनाल, ओंकार अवाडे आणि ऋतेश पाटील यांनी ‘अव्यक्तम इनोव्हेशन’ची उभारणी केली आहे.