सोलापूर – भारतात पुन्हा एकदा कोविड-१९ च्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे सध्या आढळत असलेले दोन नवीन व्हेरिएंट्स NB.1.8.1 आणि LF.7. हे व्हेरिएंट्स जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ‘Variants Under Monitoring’ म्हणून घोषित केले आहेत.
या नव्या व्हेरिएंट्समुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशभरात रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, २६ मे २०२५ रोजी देशातील सक्रिय रुग्णसंख्या १,०१० वर पोहोचली. यामध्ये केरळ (४३०), महाराष्ट्र (२१०), आणि दिल्ली (१०४) हे राज्य सर्वाधिक प्रभावित आहेत. NB.1.8.1 व्हेरिएंट एप्रिलमध्ये तामिळनाडूमध्ये प्रथम आढळला, तर LF.7 व्हेरिएंट गुजरातमध्ये ओळखण्यात आला आहे. सुदैवाने, या व्हेरिएंट्समुळे बहुतेक रुग्णांमध्ये फक्त सौम्य लक्षणेच आढळून येत आहेत जसे की ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी व थकवा. संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. योगेश राठोड यांनी याबाबत जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, ‘सध्या परिस्थिती घाबरण्यासारखी नाही, पण बेफिकिरी नक्कीच धोकादायक ठरू शकते.
नव्या व्हेरिएंट्सचा संसर्गजोर जास्त असला तरी आजार गंभीर स्वरूपाचा नाही. तथापि, वृद्ध, लहान मुले आणि सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.’ आपले कोविड लसीकरण पूर्ण करा, बूस्टर डोस घ्या. गर्दिच्या ठिकाणी मास्क वापरा, हात वारंवार धुवा, सॅनिटायझर वापरा, लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी व विलगीकरण करा असे आवाहन डॉ. राठोड यांनी केले आहे.