महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. यंदा 2025 मध्ये मान्सून नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस आधी दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी ही बातमी असून, शेतीसाठीही ही परिस्थिती अनुकूल ठरणार आहे.
IMD च्या अंदाजानुसार, 13 मेपर्यंत मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होईल. त्यानंतर 5-6 दिवसांत केरळमध्ये म्हणजेच 18-19 मे दरम्यान मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रातही मान्सून 5 ते 7 जूनदरम्यान दाखल होऊ शकतो, असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
कोकण, मुंबई-पुण्याला मान्सूनची लवकर चाहूल :
दरवर्षी मान्सून महाराष्ट्रात 9 ते 11 जूनच्या दरम्यान दाखल होतो. पुण्यात 10 जून तर मुंबईत 11 जून ही नेहमीची तारीख मानली जाते. मात्र यंदा मान्सूनचं आगमन लवकर होण्याच्या शक्यतेमुळे दक्षिण कोकणात 5 जूनपासून तर मुंबई-पुण्यात 7 ते 8 जूनपर्यंत मान्सून पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यंदा एल निनोचा प्रभाव नसल्यानं आणि ला निनासारखी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यामुळे पावसाचं प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या 105% पर्यंत राहू शकतं. त्यामुळे महाराष्ट्रासह पश्चिम आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दिलासा :
मान्सूनच्या लवकर आगमनामुळे शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या वेळेवर पेरणीसाठी योग्य वेळ मिळणार आहे. यामुळे पीक नियोजन सुधारेल आणि उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. Skymet आणि IMD च्या अंदाजानुसार, यंदा मराठवाडा आणि विदर्भातही समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या 50 दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त होते. मात्र आता 13 मेपासून मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.