शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक येत असतात. मात्र, अनेक वेळा दर्शनासाठी येताना किंवा परत जात असताना भाविकांना छोट्या-मोठ्या दुर्घटनांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर साई संस्थानने गुढी पाडव्याच्या दिवशी साईभक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता साईभक्तांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णय शिर्डीतील साई संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे.
या विमा सरंक्षणाचा लाभ घेण्यासाठी साई भक्तांना दर्शनाला येण्याआगोदर साई संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी करणे बंधनकारक आहे. घरातून निघाल्यानंतर ते साई मंदिरात दर्शन घेईपर्यंत कोणतीही अप्रिय घटना घडल्यास संबंधित व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाणार आहे.