सोलापूर शहर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. एकूण १४ लाख लोकसंख्या असलेल्या या शहरामध्ये साधारणतः ४० ते ५० टक्के लोकसंख्या ही विविध क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटीत कामगारांची आहे. हा कामगार वर्ग मिळेल त्या मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड मारून किंवा झोपडीत राहून आपला उदरनिर्वाह करीत असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी दिवसेंदिवस योग्य त्या मुलभूत सोयी सुविधांचा प्रश्न निर्माण होऊ लागलेला आहे.
नेमकी हीच समस्या जाणून सोलापूर शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)’ अंतर्गत या कामगार वर्गासाठी ५००० घरकुल उभारणीचा संकल्प मांडला.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी असंघटीत कामगारांच्या उन्नतीकरिता व त्यांचे राहणीमान उंचाविण्याकरिता या संकल्पनेला लगेचच हिरवा कंदील दाखवला व या कार्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल आणि असंघटीत कामगारांकरिता सर्व मुलभूत सोयींनीयुक्त असे एक चांगले गृहसंकुल उभारले जाईल असे आश्वासन दिले. मा.मुख्यमंत्री महोद्यांच्या आश्वासनास अनुसरुन मा.आ.श्री. विजयकुमार देशमुख मालक यांनी सोलापुरातील काही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांसमोर या संकल्पनेची माहिती मांडली. सदर संकल्पनेला सर्वांकडून उत्साही पाठींबा मिळाल्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.सुरेश रेवप्पा बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)’ अंतर्गत सोलापुरातील असंघटीत कामगारांकरिता राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, दहिटणे, ता-उत्तर सोलापूर, जिल्हा-सोलापूर या संस्थेची स्थापना केली.
सदर संस्थेच्या माध्यमातून सोलापुरातील असंघटीत क्षेत्रात काम करणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) कामगार जसे कि, रिक्षा चालक, शिलाई कामगार, यंत्रमाग कामगार, अडत कामगार, माथाडी कामगार, हॉटेल कामगार, भाजीपाला विक्रेते, रुग्णालयातील कर्मचारी, बांधकाम क्षेत्रातील कामगार, इतर व्यावसायिक दुकानात काम करणारे व अन्य गरजू कामगार वर्गासाठी ५००० घरांच्या बांधणीचे उद्दिष्ट प्रस्तावित करण्यात आले.
मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी समाजातील वंचित घटकांना अल्प किमतीत घरे उपलब्ध व्हावीत म्हणून ग्रीन झोन असलेल्या जमिनी प्रधानमंत्री आवास योजनेकरिता वापरण्याची परवानगी दिली. त्याअनुषंगाने सदर संस्थेच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये विकसित होत असलेल्या दहिटणे परिसरामध्ये जागा घेण्यात आली. १५ ते २० वर्षापूर्वीचा शेळगी-दहिटणे परिसर व आताचा विकसित शेळगी-दहिटणे परिसर, हे सर्व परिवर्तन मालकांनीच वेळोवेळी केलेल्या विकास कामांमुळेच घडून आलेले आहे व ते आज आपणा सर्वांसमोर आहे. गोरगरीब कामगारही या परिवर्तनाचे अंग व्हावे या तळमळीने राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेची स्थापना झाली. सदर परिसरामध्ये अल्प किंमतीत घरकुल प्रकल्पासाठी जागा उपलब्ध झाल्यामुळे संस्थेस घरकुलाची किंमत कमीतकमी राखण्यास बहुमोल मदत झाली.
सदर गृह्प्रकल्पामधील पहिल्या टप्प्यातील १२०० घरांच्या प्रकल्पाची एकूण किंमत रु.७४.७६ कोटी इतकी असून, एका घरकुलाची किंमत ही रु.६.२१ लाख अशी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना रु. २.५ लाख सबसिडी मिळाल्यानंतर सर्वसाधारण घटकातील जनतेला हे घरकुल रु.३.७१ लाख किमतीमध्ये उपलब्ध असेल, ते त्यांच्या बचतीतून अथवा गृहकर्जाच्या माध्यमातून सदर घरकुल मिळवू शकतात. तसेच, नोंदणीकृत व सक्रीय बांधकाम कामगार, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार व इतर कल्याणकारी मंडळाकडून अतिरिक्त प्रत्येकी रु.२.०० लाखाच्या सबसिडीस पात्र ठरल्यास हे घरकुल त्या सभासदांना फक्त रु.१.७१ लाख मध्ये उपलब्ध होते.
तसेच, मालकांनी विशेष प्रयत्न करून इतर कामगारांना घरकुलासाठी सोलापूर जनता बँकेकडून अत्यल्प व्याजदरामध्ये गृहकर्ज उपलब्ध करून सुलभ मासिक हप्त्यात परतफेडीची सुविधाही करून दिलेली आहे.
नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून मा.आ. विजयकुमार देशमुख मालकांनी सदर गृहप्रकल्पामध्ये रस्ते, ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, इ. मुलभूत सोयी-सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला, तर या प्रकल्पासाठी खास बाब म्हणून स्वतंत्र सब-स्टेशन व अंतर्गत दिवाबत्ती करिता शासनाच्या NSC योजनेमधून निधी मंजूर करून दिला.
असा जनतेच्या हिताचा, सर्व सोयींनी परिपूर्ण असा गृहप्रकल्प मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या दूरदृष्टीने व मा.आ. विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नाने पूर्णत्वास येत असल्याने, येत्या काही दिवसातच मा.देवेन्द्रजी फडणवीस साहेबांच्या शुभहस्ते सदर प्रकल्पातील लाभार्थ्यांना घरकुल हस्तांतरण करण्याचा मानस आहे व तसे प्रयत्नही चालू आहेत.
त्यासही मा.मुख्यमंत्री महोदयांनी उत्तम प्रतिसाद देऊन आपल्या मौल्यवान वेळेतून वेळ देऊन या घरकुल प्रकल्पास आवर्जून भेट देण्याचे व लाभार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील घरकुलांचे हस्तांतरण करण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्या अनुषंगाने घरकुल हस्तांतरण करण्यासाठी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे लवकरच लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळणार आहे.
तमाम सोलापूरवासीय व जनतेमधून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व आपुलकीची भावना व्यक्त होत आहे. त्यांनी असेच सोलापूरवासीयांवर विशेष कृपादृष्टी ठेवून सोलापूरचा विकास घडवावा हीच सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना.