खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा अवमान होईल, असे भाष्य करणाऱ्यांना दंड करण्यासाठी दहा वर्षे सश्रम कारावासाची अजामीनपात्र शिक्षा ठोठावणारा विशेष कायदा पारित करावा. अशी मागणी त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आपल्या मागणीचे एक निवेदन देखील त्यांनी अमित शहा यांना दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्म समभावाचा विचार देत स्वराज्याची स्थापना केली. राज्यकारभारात रयतेच्या सहभागाव्दारे लोकशाहीचा पाया रचला. लोककल्याणासाठी अहोरात्र आयुष्य वेचले. परंतु काही विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छ पध्दतीने त्यांचा तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांचा अवमान होईल असे भाष्य, टिपणी किंवा कृती करतात. यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळुन, समाजामध्ये दुफळी पसरते. अश्या प्रवृत्तींची जीभ छाटण्याची किंवा चौरंग करण्याची धमक आमच्यासह शिवप्रेमींमध्ये निश्चित आहे परंतु आम्ही संयम राखुन आहोत. केंद्र व राज्य शासनाने अश्या प्रवृत्तींना धडकी भरवणारा मकोका/ टाडा सारखा अजामिनपात्र आणि 10 वर्षे सश्रम कारावासाची व जबर दंडाची शिक्षा असलेला विशेष कायदा पारित करावा, अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे नांव घेण्याचा आपल्याला कोणालाच अधिकार राहणार नाही. अश्या रोखठोक शब्दात आपल्या भावना व्यक्त करीत, केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटुन याबाबतचे निवेदन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले आहे.