पावसाळा सुरू होण्यासाठी अजून महिनाभराचा काळ शिल्लक आहे. असे असताना राज्यातील धरणांमध्ये जवळपास फक्त 36 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे, पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ 28.83 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात या भागातील शेतीसह उद्योग-व्यवसायांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन देखील वाढत असल्याने, आत्तापासूनच पाण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.राज्यात सध्या 139 मोठ्या, 259 मध्यम आणि 2605 लहान अशा एकूण 3003 धरणांमध्ये मिळून एकूण 22350.14 दशलक्ष घनमीटर असून 789 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण 36.64 टक्के इतके आहे. गेल्यावर्षी याच तारखेला हा पाणीसाठा 37.39 टक्के होता. यावरून यंदा पाणीसाठा काहीसा कमी असल्याचे स्पष्ट होते