तमाम सोलापूरकर साखर झोपेत असताना बुधवारी सकाळी दैनिक लोकमत मुळे सोलापूरकरांना सुखद धक्का मिळाला. सिद्धेश्वर कारखान्याच्या बेकायदेशीर चिमणी मुळे सोलापूरची विमानसेवा गेल्या आठ वर्षापासून थांबली आहे .त्याच सिद्धेश्वर कारखान्याच्या मालकांनी म्हणजेच धर्मराज काडादी यांनी चक्क विमान सेवा उद्योगात उतरण्याचा निर्णय जाहीर केलाय. एवढेच एवढेच नव्हे तर 19 आसन क्षमतेची प्रत्येकी 25 कोटी रुपये किमतीची दोन विमाने खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यामुळे चिमणी न पाडता दिवास्वप्नच म्हणून राहिलेली सोलापूरची विमानसेवा आता काडादी एअरलाइन्स मुळे सुरू होईल असा विश्वास निर्माण झाला आहे. सोलापुरातील सुवर्ण सिद्धेश्वर मंदिरासाठी ज्याप्रमाणे शेतकरी सभासद तसेच समाजबांधवांनी देणग्या दिल्या त्याचपद्धतीने विमान खरेदीसाठी देखील शेतकरी पुढे येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. विमानसेवा सुरू झाल्यानंतर पर्यटन वाढेल ..नवीन उद्योग येतील हेदेखील काडादी यांनी पटवून दिले आहे.
विमानतळावर काही तरुणांना नोकऱ्या मिळतील… काही तरुणींना एयरहोस्टेस म्हणून काम करण्याची संधी मिळेल… काही शेतकऱ्यांच्या चार चाकी गाड्या विमानतळावर सेवेसाठी भाड्याने धावतील .. तमाम सोलापूरकर हैदराबाद, तिरुपती, बेंगलोर.. मुंबई कडे भुरकन उडून जातील.. अशी स्वप्ने देखील आता पाहू लागले आहेत. पुण्या-मुंबईचे आयटी पार्क वाले आता सोलापूरकडे येतील असा आशावाद निर्माण झाला आहे. आपले राजू मालकच विमान सेवा सुरू करणार असल्यामुळे शेतकरी सभासद कमी किमतीचे तिकीट मिळेल म्हणून आनंदू लागले आहेत. एकुणच सोलापुरात बुधवारी आनंदाचे आणि उत्साहाचे वारे वाहू लागले आहे. पुणे मुंबईकडे होणारे स्थलांतर देखील थांबेल ..तरुणांच्या हाताला काम मिळेल अशी गुलाबी चित्रे रंगू लागले आहेत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले असं म्हणत अनेक सोलापूरकरांनी काडादी एअरलाइन्स सुरू झाल्यानंतर लगेच धर्मराज काडादी यांना मानपत्र देण्याबाबत विचार सुरू केला आहे. सिद्धेश्वरांचा आशीर्वाद आणि खासदार जयसिद्धेश्वरांची साथ यामुळे शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरणाऱ्या सिद्धेश्वर कारखान्या ची काडादी एअरलाइन्स लवकरच सुरू होईल अशी आशा करायला काहीच हरकत नाही