नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून उभ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट ढवळून काढणारे एनसीबीचे वादग्रस्त ठरलेले विभागीय संचालक समीर वानखेडे यांची अखेर डीआरआय विभागात बदली करण्यात आली. वानखेडे यांचा एनसीबीमधील कार्यकाळ संपलाय. त्यामुळे त्यांना त्यांच्या पूर्वीच्या डीआरआय अर्थात डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स विभागामध्ये पाठवण्यात आले आहे.
2008 ते 2021 पर्यंत वानखेडे यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. वानखेडेंची 2020 मध्ये एनसीबीमध्ये बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतरही त्यांना एनसीबीत ठेवण्यासाठी लॉबिंग सुरू आहे. भाजपचा एक मोठा नेता तसे प्रयत्न करत आहे, अशा आरोपाची राळ मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी उठवली होती. मात्र, अखेर वानखेडे यांची बदली झाल्याचे वृत्त आज समोर आले आहे. वानखेडे यांनी जातीची बोगस कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवली. आपला धर्म लपवला, असे अनेक आरोप नवाब मलिक यांनी केले होते. मात्र, वानखेडेंनी हे सारे आरोप फेटाळलेत.