येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाचं काल सूप वाजलं. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गृह विभाग आणि पोलीस दल यांसदर्भातील चर्चेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिली. दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन 50 हजार पदांच्या पोलीस भरतीची (Police Recruitment) प्रक्रिया सुरु करणार असल्याचं सांगितलं.
पोलीस भरती संदर्भात सरकारकडून केवळ आश्वासन देण्यात आलं होतं, ते पूर्ण करण्यात आलं नाही, असा आरोप विरोधकांनी केला होता. या आरोपावर दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिलं. आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री असताना 60 हजार पदांची पोलीस भरती करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी टप्प्या टप्प्यानं पोलीस भरती करण्यात आली होती. त्या काळात पहिल्या टप्प्यात 10 हजार पोलिसांची भरती करण्यात आली होती, अशी माहिती दिलीप वळसे पाटील म्हणाले.
सध्याची भरती पूर्ण करुन नव्यानं भरती
सध्या पहिल्या टप्प्यात 5200 पदांची भरती सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात 7 हजार पोलीस भरण्यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे. राज्यातील पोलिसांचं बळ कमी आहे. त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.