वंचित घटकांसाठी काम करणाऱ्यांना दिला जातो १ लाखाचा पुरस्कार
सोलापूर : येथील उद्योगवर्धिनी संस्थेच्या माध्यमातून शेकडो महिलांच्या जीवनात परिवर्तन आणणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या चंद्रिका चौहान यांना पुणे येथील नातू फाउंडेशनचा महादेव बळवंत नातू पुरस्कार जाहीर झाला आहे. ध्येयवादी वृत्तीने आपल्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष किमान एक तपाहून अधिक काळ राहून वंचित घटकांसाठी शिक्षण, आरोग्य, महिला विकास व ग्रामीण विकास विषयक कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो. श्रीफळ, स्मृतीचिन्ह व १ लक्ष रुपये असे याचे स्वरूप आहे.
पुणे येथे ९ जानेवारी रोजी कै. नातू यांच्या स्मृतीनिमित्त ज्येष्ठ विधिज्ञ व स्त्री अध्ययन केंद्राच्या अध्यक्षा डॉ. जया सागडे या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल. ऐतिहासिक नातू घराण्यातील महादेव बळवंत उर्फ भाऊसाहेब नातू यांनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी तसेच उच्च सामाजिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी नातू फौंडेशनची पुण्यात स्थापना केली. आपली वैयक्तिक सारी संपत्ती त्यांनी या ट्रस्टकडे सुपूर्द केली. यातून मागील ३२ वर्षांपासून तळागाळात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना नातू पुरस्कार व ग्रामीण भागातील सामाजिक संस्थाना देणग्या नियमितपणे देण्यात येत आहेत.याच कार्यक्रमात ग्रामीण अथवा आदिवासी भागासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तीस सेवाव्रती पुरस्कार देण्यात येतो. रोख २५,०००/- रुपये व स्मृतीचिन्ह असे याचे स्वरूप आहे. यंदाच्या वर्षी हा पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा व नागभीड परिसरातील महिला बचत गट, बचत गटांचे परिसर संघ, सामूहिक वनहक्काशी निगडीत ग्रामसभा व महाग्रामसभा यांच्या माध्यमातून आदिवासी महिला सक्षमीकरणाचे कार्य करणाऱ्या कुमारीबाई जमकातन यांना देण्यात येणार आहे.