येस न्युज नेटवर्क : विधानसभा सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क न वापरण्यावरून संताप व्यक्त केला. अजित पवार यांनी मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांवर आपली नाराजी व्यक्त केली. काही जणांचा अपवाद वगळता इतरांकडून मास्कचा वापर करण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. मास्क न वापरणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढावे अशी मागणीदेखील त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत म्हटले की, देशाचे पंतप्रधान हे कोरोना संदर्भात गंभीर असून त्याबाबत बैठका घेत आहेत. काही राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. विषाणूमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. परदेशात दीड दिवसात रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. तर येत्या काळात परदेशात पाच लाख लोकांची मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. काही गोष्टींचे योग्य वेळी गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.