वाराणासी: काशी ही अलौकीक नगरी आहे. ही नगरी अति प्राचीन आहे. या नगरीला इतिहास आहे. सभ्यता आहे. या नगरीत आल्यावर सर्वच लोक बंधनातून मुक्त होतात. या मातीत एक अलौकिक आणि अद्भूत ऊर्जा आहे, असं सांगतानाच इथे जेव्हा औरंगजेबाचा अत्याचार वाढतो, तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी या भूमीत छत्रपती शिवाजीच उभे ठाकतात, असे गौरवौद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी काशीची प्राचीनता, परंपरा, सभ्यता आणि परंपरेवर भाष्य केलं. आक्रमकांनी या नगरीवर आक्रमण केलं. या नगरीलाउद् ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाच्या अत्याचार आणि दहशतीची ही नगरी साक्षीदार आहे. औरंगजेबाने तलवारीच्या बळावर इथली सभ्यता बदलण्याचा प्रयत्न केला. कट्टरतेने इथली संस्कृती गाडण्याचा प्रयत्न केला. मात्र या देशाची माती जगापेक्षा वेगळी आहे. इथे जेव्हा औरंगजेब असतो तेव्हा छत्रपती शिवाजीही निर्माण होतात. एखादा सालार मसूद येतो तेव्हा राजा सुहेलदेव सारखे वीर योद्धे आपल्या एकतेचं दर्शनही घडवतात, असं मोदींनी सांगितलं. त्यावेळी साधू-संतांनी टाळ्यांचा गडगडाट करत मोदींचा जयजयकार केला.