येस न्युज मराठी नेटवर्क : शरद पवार आणि अमित शाह यांची 26 मार्चला अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याच्या कथित वृत्तानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे राज्यात भाजपच्या नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात रान उठवले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या मुद्द्यावरुन भाजपचे नेते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणायची भाषाही करत आहेत. नेमक्या त्याचवेळी शरद पवार आणि अमित शाह (Amit Shah) यांची झालेली ही भेट अनेकांसाठी चक्रावून टाकणारी आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या खास मर्जीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. या भेटीमागचे राजकारण नव्या पिढीला कळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त भेट झाली तर तुमचे कोण गुप्तहेर होते हे माहीत नाही. पण 50 वर्षांच्या राजकीय जीवनात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी जेवढे मित्र कमावले नाहीत तेवढे मित्र पवार साहेबांनी कमावले आहेत. मग त्यातील कश्मीरचे फारूक अब्दुल्ला असतील, ओदिशातील विजू पटनाईक असो बंगाल मधले जोत्या बसू असो. ज्या ज्या राज्याचे प्रमुख नेते आहेत ते कायम शरद पवार यांचे मित्र राहिलेत. आपल्या राज्यातील भाजप नेते प्रमोद महाजन हे यांच्याशीही शरद पवार यांचे जवळचे संबंध होते. संबंध आणि राजकारण याचा विचित्र प्रकार आता नवीन पिढीच्या राजकारणात आलाय. राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो, तो फक्त वैचारिक विरोधक असतो, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.