केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालकांचा दावा
रायपूर : केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी छत्तीसगड माओवादी हल्ल्याबद्दल बोलताना गुप्तचर यंत्रणा किंवा ऑपरेशनच्या अपयशाची चर्चा फेटाळून लावली आहे. छत्तीसगडमध्ये झालेल्या माओवादी हल्ल्यात २२ जवान शहीद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर गृहमंत्री अमित शहांकडून कुलदीप सिंह यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी जाण्याचे निर्देश देण्यात आले होते.कुलदीप सिंह यांच्या म्हणण्यानुसार, या ऑपरेशनमध्ये ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या सांगणे आत्ताच कठीण आहे परंतु, सुरक्षा यंत्रणेकडून २५- ३० माओवाद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा कुलदीप सिंह यांनी केला आहे . मृत आणि जखमी झालेल्या माओवाद्यांना घेऊन जाण्यासाठी तीन ट्रॅक्टरचा वापर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश असतं तर जवान मिशनवर गेलेच नसते आणि हे ऑपरेशनचे अपयश असते तर एवढ्या मोठ्या संख्येत माओवादी ठार झालेच नसते, असेही महासंचालक कुलदीप सिंह यांनी म्हटले आहे.