बेपत्ता असलेल्या 14 जवानांचे मृतदेह सापडले
बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी चकमकीत आणखी 14 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘एएनआय’च्या माहितीनुसार, काल चकमक झाली त्याच परिसरात आणखी 14 जवानांचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे आता या नक्षलवादी चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांचा आकडा 23 वर पोहोचला आहे.
काल शनिवारी सुरक्षा दल आणि पोलिसांची बिजापूरच्या तररेम जंगलात चकमक उडाली होती. तब्बल तीन तास याठिकाणी जोरदार धुमश्चक्री सुरु होती. यावेळी 21 जवान गायब झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी आज सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. मात्र, आता 21 पैकी 14 जवान मृत्यूमुखी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित सात जवानांचा शोध अजूनही सुरु आहे. काल या चकमकीत 8 जवान शहीद झाले होते. तर 24 जवान जखमी झाले होते. यापैकी 7 जवानांची प्रकृती गंभीर आहे.