मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) विरोधात आता बॉलिवूड कलाकारही व्यक्त होऊ लागले आहेत. यामध्येच काँग्रेसची माजी सदस्य आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीदेखील सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. ‘सीएए म्हणजे काळा कायदा’, असल्याची टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
“ज्या व्यक्तीने महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्या ती व्यक्ती कोण होती? तो एक मुसलमान होता? का शीख किंवा ख्रिश्चन होता? तो एक हिंदू होता. आता याविषयी मी काय वेगळं सांगू. सध्या जे सुरु आहे ते अत्यंत भीतीदायक आहे. १९१९ मध्ये दुसरं महायुद्ध संपल्यानंतर भारतीयांच्या मनात असंतोष खदखदत होता, आणि याची जाणीव ब्रिटीशांना होता. त्यामुळे या असंतोषाचा विस्फोट होईल हे लक्षात घेऊन ब्रिटीशांनी एक कायदा लागू केला. हा कायदा रोलेट अॅक्ट नावाने ओळखला जात होता. या कायद्याअंतर्गत कोणत्याही व्यक्तीला देशविरोधी कृत्य केल्याच्या संशयातून, त्याची कोणतीही बाजू न ऐकता त्यांना तुरुंगात डांबण्याचा अधिकार होता. सध्या देशात तेच सुरु आहे. १९१९ प्रमाणेच आता सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) म्हणजे काळा कायदा आहे”, असं उर्मिला म्हणाल्या.