सोलापूर – राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत अंगीकारले आहे. वैभवशाली राष्ट्र बनवण्यासाठी युवकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आता सोलापूर जिल्ह्यातील गाव-खेडे समृद्ध बनवण्यासाठी तरुणांनी योगदान द्यायला हवे, असे मत राज्याचे माजी मंत्री तथा सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार साखळी शिबिराचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, विद्यापीठ विकास प्रबोधनीचे अभिजीत पाटील, सिनेट सदस्य चन्नवीर बंकुर, सुदर्शन यादव, महेंद्र घागरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले.
आमदार देशमुख म्हणाले की, कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी दरवर्षी एक लाख वृक्ष लागवड करण्याचा घेतलेला ध्यास खूप कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हे कार्य घडत आहे, ही प्रशंसनीय बाब आहे. तरुणांनी समाज, देश विकासासाठी कार्य करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात पाच लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केल्याचे सांगितले. यंदा पहिल्या वर्षी एक लाख वृक्ष लागवड करण्यात येणार असून त्यातील 50 हजाराहून अधिक झाडे लावल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये आंबा, चिकू, स्वीट मोहगणी, बांबू आदी फळझाडे तसेच औषधी वनस्पतींचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. या साखळी शिबिरात हिराचंद नेमचंद कॉलेज, फार्मसी कॉलेज, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सिंहगड कॉलेज, डी ए व्ही वेलणकर महाविद्यालयाचा समावेश आहे. 280 विद्यार्थी पुढील सात दिवस विद्यापीठात वृक्षारोपण तसेच श्रमदान करणार आहेत.
