पंढरपूर : यंदा आषाढी यात्रा पायी होणार की बसने याचा घोळ केव्हाही सुटो मात्र पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या महाराज आणि वारकऱ्यांचे लसीकरण करूनच त्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा अशी मागणी पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले यांनी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फार मोठा फटका पंढरपूर परिसराला बसल्याने यंदा गेल्यावर्षी प्रमाणे प्रातिनिधिक स्वरूपातच वारी करण्याची भूमिका पंढरपूर मधील नागरिकांची आहे.
संतांच्या मानाच्या सातही पालखी सोहळे थांबत असलेले मठ हे प्रदक्षिणा मार्गावर असून शहराची सर्वात जास्त लोकसंख्या प्रदक्षिणा मार्गाच्या आतल्या बाजूस आहे. यामुळे येणारे वारकरी लसीकरण करून आले तर नागरिकांना धोका कमी वाटेल अशी भूमिका नगराध्यक्ष साधना भोसले यांनी व्यक्त केली. अशाच पद्धतीची भूमिका प्रदक्षिणा मार्गावरील कुटुंबांनी देखील मांडली आहे.