सोलापूर – भारतात सर्वहारा वर्ग आणि आहे रे वर्ग यामध्ये दरी निर्माण करण्याचे काम इथल्या भांडवली व्यवस्थेने जाणीवपूर्वक निर्माण केलेले आहे. त्यामुळे सामाजिक व आर्थिक असमानता अधिक वेगाने रूढ झाली. त्यामुळे अनेक लोक आपल्या निसर्गदत्त न्याय हक्कापासून वंचित आहेत. अशा वंचित, पिडीत ,उपेक्षित घटकाला न्याय मिळवून देणे हे अंतिम ध्येय स्वीकारून आजीवन जनतेची लढाई करण्याचा प्रतिज्ञा घेतलेल्या शहिदांच्या त्यागाचे व रक्ताचे प्रतिक म्हणून लाल झेंडा मानला जातो. हा लाल झेंडा खांद्यावर घेऊन जनतेच्या हितापुढे स्वतःचे हित गौण मानून लढ्यात आलेला लाल सैनिक अर्थातच कॉम्रेड आपले आयुष्य जनतेच्या चळवळीसाठी समर्पित करतो. अशांची स्मृती जागवणारा ‘लाल झेंडा दिवस’ हा जनतेत रुजला पाहिजे. याकरिता लाल झेंडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केल्याची भावना ज्येष्ठनेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांनी व्यक्त केले.
मंगळवार दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी दत्त नगर लाल बावटा मध्यवर्ती कार्यालय येथे ज्येष्ठनेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तत्पूर्वी प्रजा नाट्य मंडळाचे शाहीर प्रशांत म्याकल,विशाल पवार,अरुण सामल,चंद्रकांत मंजुळकर व अन्य शाहिरांनी क्रांतिगीते सादर केले.
यावेळी मार्गदर्शन करताना कॉ. एम.एच.शेख म्हणाले कि, २७,२८ फेब्रुवारी व १ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी पक्षाचे राज्याचे अधिवेशन पार पडणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात सध्या भेडसावत असलेल्या समस्या, राज्य सरकारची धोरणे, मोठ्या प्रमाणात वाढत असलेली बेरोजगारी, महागाई, विविध क्षेत्रात फोफावलेला भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, शैक्षणिक क्षेत्रातील मक्तेदारी आणि शिक्षणाचे बाजारीकरण या सर्व आव्हानाविरुध्द लढण्याची रणनीतीची आखणी करण्यात येणार आहे.
यावेळी प्रास्ताविक करताना माकपा जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख म्हणाले कि, पक्षाने दिलेल्या आवाहनानुसार संपूर्ण शहरात व कुंभारी परिसरात लाल झेंडे, फरारी लावून संपूर्ण वातावरण लालमय केले व जनतेमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण करून त्यांच्या प्रश्नांची जाणीव करून दिली. ५३ शाखामार्फत झेंडावंदन करून आपापल्या भागातून कार्यकर्ते जथ्थेकरून पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय येथे दाखल झाले. लाल झेंडे को लाल सलाम, मार्क्सवाद लेनिनवाद जिंदाबाद, स्वातंत्र लोकशाही समाजवाद जिंदाबाद, शेतकरी-कामगार एकजूटीचा विजय असो, विद्यार्थी युवा महिला एकता जिंदाबाद, धर्म कि लढाई झुठी है, देश कि जनता भूखी है अशा गगनभेदी आवाजात घोषणा देऊन वातावरणामध्ये स्फुल्लिंग चेतावले.
यावेळी मंचावर नसीमा शेख,नलिनी कलबुर्गी, शेवंता देशमुख,व्यंकदेश कोंगारी,रंगप्पा मरेड्डी, ॲड अनिल वासम यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विल्यम ससाणे, मुरली सुंचू बापू साबळे, बाबू कोकणे , अकील शेख,इलियास सिद्दीकी, दाउद शेख,नरेश दुगाने, दीपक निकंबे, अशोक बल्ला, सनी शेट्टी,श्रीनिवास म्हेत्रे, दत्ता चव्हाण, शकुंतला पाणीभाते,, लिंगव्वा सोलापूरे, मल्लेशाम कारमपुरी, विरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसूरे, अभिजीत निकंबे आदींची उपस्थिती होती.